भीषण अपघात : रात्रीच्या अंधारात जीपने 8 जणांना चिरडले, दोन चिमुकल्यांसह 5 जणांचा मृत्यू

टीम AM : पुण्याच्या जुन्नरमध्ये रात्रीच्या अंधारात पिकअप जीपने दोन दुचाकींसह 8 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. नगर – कल्याण महामार्गावर लवणवाडीत हा भीषण अपघात झाला आहे. रात्रीच्या अंधारात भरधाव पिकअप जीपने दोन दुचाकीना उडवले. या अपघातात आठ जण चिरडले गेले. यातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे, मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात दुचाकीवरून जाणारे प्रवाशी हे शेतमजूर होते. हे सर्व शेतमजूर नारायणगाव येथुन शेतातील कामे आटोपून पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे घराकडे जात होते. या दरम्यान नगर – कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे पिकअप जीपने दुचाकीवरून जाणाऱ्या आठ जणांना चिरडल्याची घटना घडली.

या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. यामध्ये एका चिमुकल्यांसह एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान तीन जाणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन चिमुकले, दोन पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे.

मृतांमध्ये सुंदराबाई (वय 28 वर्षे), गौरव मधे (वय 5 वर्षे), नितीन मधे (वय 25 वर्षे) यांच्यासह एका लहान मुलाचा समावेश आहे. मृतांपैकी एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. तर अर्चना मधे आणि सुहास मधे असे गंभीर असलेल्या दोन प्रवाशांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात तीनही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यातील पिकअप जीपचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, अपघातातील जखमी प्रवाशांना उपचारासाठी खाजगी रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे.