टीम AM : दिल्लीतील मालवीय नगरच्या हौज रानी परिसरात लागलेल्या भीषण आगीने अनेक कुटुंबांचे जीवन हादरवले. या संकटाच्या क्षणी मात्र गादी व्यापारी रियाजुद्दीन मन्सूरी आणि त्यांचा मुलगा अरमान यांनी दाखवलेली माणुसकी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
आगीच्या ज्वाळांनी इमारत वेढलेली असताना, आत अडकलेले नागरिक जीव वाचवण्यासाठी खिडक्या आणि बाल्कनीतून खाली उड्या मारत होते. अशा भीषण परिस्थितीत रियाजुद्दीन यांनी कोणताही विचार न करता आपल्या दुकानातील सुमारे 20 – 25 गाद्या आणि रजया तात्काळ रस्त्यावर पसरल्या. जवळपास 2 लाख रुपयांचा माल बाजूला ठेवत त्यांनी सर्वात आधी माणसांचे प्राण वाचवण्याला प्राधान्य दिले.
स्थानिक नागरिक आणि विविध वृत्तांनुसार, त्यांच्या या तत्पर आणि धाडसी निर्णयामुळे अनेकांना गंभीर जखमांपासून वाचवता आले आणि किमान 8 जणांचे प्राण सुरक्षित राहिले.
आजच्या काळात जिथे अनेकदा नकारात्मक बातम्या चर्चेत असतात, तिथे रियाजुद्दीन यांच्यासारखी माणसं हेच दाखवून देतात की माणूसकी, संवेदनशीलता आणि धैर्य अजूनही जिवंत आहे. कधी कधी व्यवसायापेक्षा मोठं काहीतरी घडतं… आणि तीच माणसं इतिहासाच्या पानांवर अजरामर होतात.



