फेक आयडीवरून ट्रोलिंग महागात पडणार : फडणवीस सरकारची मोठी तयारी, वाचा…!

टीम AM : सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जाणारी नाहक बदनामी आणि ‘फेक अकाउंट्स’ चा सुळसुळाट रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत याविरोधात मोठी घोषणा केली.

सोशल मीडियावरील बदनामीकारक मजकुराला लगाम घालण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे.

आमदार राहुल कुल यांनी वेधलं लक्ष


प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान भाजप आमदार राहुल कुल यांनी सोशल मीडियावरील बदनामीचा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला. “सोशल मीडियावर कोणाचीही बदनामी करण्यासाठी सध्या एक मोठी यंत्रणा कार्यरत आहे. अनेक फेक अकाउंट्सच्या माध्यमातून लोकांची प्रतिमा मलीन केली जाते. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच. हे अभिव्यक्ती जपण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. पण फेक अकाउंटद्वारे बदनामी थांबवण्यासाठी सरकार काही कायदा करणार आहे का, ? असा माझा प्रश्न असल्याचे राहुल कुल यांनी म्हटले.

पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वात समिती


राहुल कुल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या गंभीर विषयावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. “सोशल मीडियावरील बदनामी रोखण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. ही समिती सध्याच्या कायद्यात सुधारणा करायची की नवा स्वतंत्र कायदा आणायचा, याचा सखोल अभ्यास करून सरकारला शिफारस करेल,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.

सोशल मीडियावर फेक अकाउंटचा सुळसुळाट आणि बदनामी…


मागील काही वर्षांपासून सोशल मीडियावर अनेक फेक अकाउंट्स कार्यरत आहेत. या अकाउंट्सच्या माध्यमातून द्वेष पसरवणारा मजूकर, चिथावणीखोर वक्तव्ये, खोटी माहिती प्रसारीत केली जाते. समाजात तेढही निर्माण होत असल्याची भीती व्यक्त केली जाते. या फेक अकाउंटसवर कारवाई करण्याची मागणी अनेकदा होत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here