सरकारने टायअप करण्याची सौरव कांबळे या तरुणाची मागणी
टीम AM : वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी अंबाजोगाई येथील एका तरुणाने एक अभिनव पाऊल उचलले आहे. सौरव बापूदेव कांबळे या स्थानिक तरुणाने ‘सायबर बंधू डॉट कॉम’ नावाची एक वेबसाइट विकसित केली आहे, ज्याद्वारे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल नंबरचा होणारा गैरवापर थांबवता येऊ शकतो. दरम्यान, राज्य सरकारने टायअप करण्याची मागणी सौरव कांबळे या तरुणाने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केलीआहे.
अंबाजोगाई शहरातील नागझरी परिसरातील शिक्षक बापूदेव कांबळे यांचा मुलगा असलेल्या सौरवने ही वेबसाइट तयार केली आहे. सध्या तो ‘एनआयटी’ कॉलेज, जालंधर (पंजाब) येथे ‘बीटेक’ चे शिक्षण घेत आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण हे ग्रामीण भागातील बर्दापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे.
आजच्या डिजिटल युगात अनेकांच्या आधार, पॅन किंवा मोबाईल नंबरचा गैरवापर केला जातो, ज्यामुळे मोठे आर्थिक आणि कायदेशीर नुकसान होऊ शकते. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन, सौरवने ही वेबसाइट तयार केली आहे.
या वेबसाइटच्या माध्यमातून, वापरकर्ते त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मोबाईल नंबरचा वापर कोणी, कधी आणि कशासाठी केला आहे, याची माहिती मिळवू शकतात. यामुळे आपल्या माहितीचा गैरवापर होत आहे का ? हे वेळीच समजून घेणे शक्य होईल. सायबर गुन्हेगारी रोखण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे आणि स्तुत्य पाऊल मानले जात आहे. सौरवच्या या संशोधनामुळे अनेक नागरिकांची फसवणूक टाळता येऊ शकते.



