टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी घडली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदान या ठिकाणी दिनांक 29 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरु आहे. या आंदोलनात अद्याप कुठलाही तोडगा निघाला नसल्याने आलेल्या नैराश्यातून नितीन माणिकराव चव्हाण या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे सुगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मराठा आरक्षणासाठी नितीन चव्हाण या तरुणाने आत्महत्या केल्याचं माहिती होताच मुंबई येथे आंदोलनासाठी गेलेले जवळपास 70 ते 80 तरुण सुगाव गावाकडे परत निघाले आहेत, अशी माहिती प्राप्त झाली आहे.



