स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभागरचनेनुसार : सुप्रीम कोर्टाने ‘त्या’ याचिका फेटाळल्या, वाचा…

टीम AM :  महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. निवडणुकांमध्ये 27 टक्के ओबीसी आरक्षणाला विरोध करणारी तसेच नव्या प्रभागरचनेला विरोध करणारी याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे 27 टक्के आरक्षणासह निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. ओबीसी समाजासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे.

आरक्षण आणि प्रभागरचनेविरोधातील याचिकांवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने दोन्ही याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी समाजाला त्याचा मोठा राजकीय फायदा मिळणार आहे.

सुप्रीम कोर्टाने 6 मे रोजीच्या आदेशानुसार 27 टक्के आरक्षण निवडणुकांमध्ये राहील, असे स्पष्ट केले आहे. तसेच 11 मार्च 2022 च्या प्रभागरचनेनुसार निवडणुका होणार नाहीत. नव्या प्रभागरचनेनुसार निवडणुका पार पडतील, असेही कोर्टाच्या निकालामुळे आता स्पष्ट झाले आहे.