टीम AM : सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश महाराष्ट्राचे सुपूत्र भूषण गवई यांनी निवृत्तीनंतर कोणतेही शासकीय लाभाचे पद स्वीकारणार नसल्याचे म्हटले आहे. निवृत्तीनंतर जास्तीत जास्त वेळ दारापूर, अमरावती आणि नागपुरात घालवणार असल्याचे गवई यांनी म्हटले आहे.
भूषण गवई हे सरन्यायाधीश झाल्यानंतर प्रथमच त्यांचे मूळ असलेल्या दारापुरात पोहोचले. त्यांचे आगमन होताच संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
गावी पोहोचताच सरन्यायाधीशांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी आपल्या गावच्या जुन्या घराला भेट देत आठवणींना उजाळा दिला. गावातील विकंदर महाराज, राजे बुवा महाराज, हनुमान मंदिरांमध्ये भेटी देऊन दर्शन घेतले. गावामध्ये आगमन झाल्यानंतर गावातील शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शाळेसमोर उभे राहून सरन्यायाधीश भूषण गवई यांचे स्वागत केले. यावेळी भारत माता की जय अशा घोषणाबाजी सुद्धा विद्यार्थ्यांनी दिल्या. एकोप्यानं राहणाऱ्या गावाचं प्रतीक म्हणजे हे दारापूर असल्याचे सरन्यायाधीश गवई यावेळी म्हणाले. सरन्यायाधीशांना पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.