टीम AM : बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गेवराई शहरानजीक असणाऱ्या गढी पुलावर एका एसयूव्ही वाहनाचा डिव्हायडरवर धडकून किरकोळ अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले.
याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने सहा जणांना जबरदस्त धडक दिली. यात सहा जणांचा मृत्यू झाला. हा अपघात मध्यरात्री झाल्याची माहिती समोर येत आहे.
या अपघातामध्ये बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून त्या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराईवर शोककळा पसरली आहे.