टीम AM : बीड जिल्ह्यात 40 दिवसांपासून अधिक कालावधीत समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर महाविकास आघाडीच्या वतीने आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी ‘जनआक्रोश’ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महाविकास आघाडीचे मित्रपक्ष आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा निघाला. बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरून हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

बीड जिल्ह्यात 40 दिवसांपासून अधिक कालावधीत समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना सरसकट 1 लाख रूपये मदत करावी, 100 टक्के पिक विमा मंजुर करावा, 25 टक्के जोखीम अग्रीम देण्यात यावे, विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक शुल्क व शेतकर्यांचे वीज बील माफ करावे, जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून जनावरांना चारा व जनतेला मोफत स्वस्त धान्य उपलब्ध करावे, एम.आर.ई.जी.एस.(रोहयो) अंतर्गत कामे सुरू करण्यात यावीत, यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी उपजिल्हाधिकारी यांना महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आले.
यावेळी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादीचे बबन गित्ते, युवा नेते आदित्य पाटील, राहुल सोनवणे, डॉ. नरेंद्र काळे, शिवसेनेचे मदन परदेशी, गजानन मुडेगावकर या प्रमुख नेत्यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.