नुकसान झालेल्या एकाही शेतकऱ्याला राज्य शासन मदतीपासून वंचित राहू देणार नाही : कृषी मंत्री अब्दुल सत्तार

बीड : मागील काही दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील 2 हजार पेक्षा जास्त गावांत नुकसान झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. यामुळे तातडीने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील पाहणी करून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज बीड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करा तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा व मदतीपासून वंचित राहणार नाही, याची गांभीर्याने दक्षता घ्या, असे निर्देश त्यांनी शासकीय यंत्रणेस दिले.

राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होत असून मदतीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज बीड जिल्ह्यातील कोळवाडी, धनगर वाडी, पिंपरनई , लिंबागणेश येथे गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. ते म्हणाले, राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मराठवाड्याबरोबरच विदर्भातील जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा करण्यात येणार असून पश्चिम महाराष्ट्रातील नुकसान पाहणी साठी कृषी आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत असे सांगून कृषी मंत्री सत्तार यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.