टीम AM : मार्गशीर्ष अमावस्या ही म्हणजे वेळा अमावस्या. मुळात अमावस्या म्हणलं की तिला एक भिती असते. पण दिवाळी आणि वेळा अमावस्या हे सण मुख्यवते आनंददायी सण म्हणुन साजऱ्या होणाऱ्या अमावस्या मानल्या जातात. आपल्या महाराष्ट्राला अनेकविध सणांची भलीमोठी परंपरा आहे. त्यातलाच हा एक सण. ही वेळा अमावस्या लातूर, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागात साजरी होते. तसं पाहायला गेलं तर हा आहे मूळचा कर्नाटकातला सण. तिथून तो महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये बहुतेक हा सण नसतो, त्यामुळे हा सण नेमका काय आणि कसा याबाबत जाणून घेऊयात.
शेताच्या काळ्या आईच्या पूजेचा. ही आई आपल्याला धान्य देते, पालनपोषण करते, तिचे उपकार स्मरण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या दिवशी तुम्हांला या जिल्ह्यातील कोणत्याही गावात कुणी सापडणार नाही. जणू सगळीकडे अघोषित संचारबंदीच असते. मात्र शेतं आणि शिवारं गर्दीने फुलून गेले असतात.
प्रत्येक शेतात घरातील लोक, पाहुणे, मित्रमंडळी यांच्यामुळे सगळे शिवार माणसाने फुलून जातात. भागात जे मुख्य पीक असतं त्या भागात त्याला लक्ष्मी म्हटलं जातं. या दिवसांत पिकं ज्वारी पोटऱ्यात येण्याच्या म्हणजेच कणीस भरण्याची स्थितीत असतात. म्हणजेच यावेळी लक्ष्मी गर्भवती आहे, असे समजून तिच्या डोहाळे जेवणासाठी काही खास पदार्थ केले जातात. डोहाळजेवण आणि त्यात थंडी ! म्हणून वेळा अमावास्येचा मेनू हा थंडीला सामोरे ठेऊन तयार केला जातो. हे पदार्थ थंडीच्या दिवसात खाणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं.
‘हा’ असतो वेळा अमावस्येचा मेन्यू
या काळात रान विविध भाज्यांनी फुललेलं असतं. त्यामुळे सोळा भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते. बाजरी ऊर्जा देते म्हणून बाजरीचे पीठ उकडून त्याचे उंडे बनवले जातात. गुळसुद्धा उष्ण असतो म्हणून गूळ घालून गव्हाची खीर आणि हे सगळे पचवण्यासाठी ज्वारीचं पीठ रात्रभर ताकात मुरवून केलेली आंबील, या सर्व पदार्थांनी आधी धरणीमातेची ओटी भरतात. या दिवशी सर्वात जास्त, सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे आंबील.. हा पदार्थ सर्वात जास्त पिला जातो. या दिवशी शेतात कडब्याची म्हणजे धान्यांच्या वाळलेल्या धाटांची खोप बांधतात. पाच पांडवांची आणि इतर देवतांची पूजा करुन नैवेद्य दाखवतात. पूजेनंतर सगळेजण एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतात. हा कार्यक्रम इतका महत्त्वाचा असतो की ज्यांचं स्वतःचं शेत नाही त्यांना दुसऱ्यांच्या शेतात आग्रहाने बोलावतात. या दिवशी सगळ्यांचा संध्याकाळपर्यंत शेतात मुक्काम असतो. उन्हं उतरली की लोक परतीच्या वाटेला लागतात. एक दिवस काळ्या आईच्या सान्निध्यात राहायचं, या सणाची पुढच्या वर्षीपर्यंत आतुरतेने वाट पाहिली जाते.
साभार : प्रशांत भोसले