मुंबई : राज्यातील सर्वसामान्यांची दिवाळी गोड जावी आणि शिधावाटप दुकानांवर धान्य घेणाऱ्या लाखो नागरिकांना दिवाळी सणानिमित्त चार वस्तू फक्त 100 रुपयांत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर या वस्तू जनसामान्यांपर्यंत अल्पकालावधीत पोहोचविण्याच्या दृष्टीने विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. 19 व 20 ऑक्टोंबरपर्यंत या चारही वस्तू जिल्हापातळीवर सर्व रेशनिंग दुकानांवर पोहोचविण्यात येतील व त्यानंतर या वस्तूंचे वाटप करण्यात येईल,अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
दिवाळी सणानिमित्त 1 किलो रवा,1 किलो चणाडाळ,1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या चार वस्तू प्रत्यक्षात वेगवेगळ्या ठिकाणांवरुन रेशनिंग दुकानांपर्यंत अथवा रेशनिंग गोदामात पोहोचणार आहेत. आणि शिधावाटप धारकांना त्यांचे एकत्रित वितरण केले जाणार आहे. या योजनेचा लाभ अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील शिधावाटप पत्रिका धारकांना तसेच पात्र एपीएल (केशरी),शेतकरी शिधावाटप पत्रिका धारकांना दिवाळी निमित्त या योजनेचा लाभ मिळणार आहे,असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
राज्यातील गोरगरिबांची दिवाळी गोड जावी या उद्देशाने शासनाने घेतलेला हा निर्णय अतिशय पारदर्शक आहे. त्या दृष्टीने निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविण्यात आली.