टीम AM : दुष्काळी बीड जिल्ह्यात निसर्गाचा अनोखा चमत्कार समोर आला आहे. भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या बीडच्या घोगस पारगाव शिवारात असलेली एक विहीर अचानक पाण्याने तुडुंब भरली आहे. भगवानगडाच्या मालकीच्या जागेत असलेल्या या विहिरीला अचानक पाणी आल्याने चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय बनला आहे.
विशेष म्हणजे या विहिरीपासून अवघ्या शंभर फुटावर असलेल्या विहिरी कोरड्या ठाक आहेत. मात्र, या विहिरीलाच पाणी आले कसे ? असा प्रश्न चर्चिला जात आहे. विशेष म्हणजे भगवानगडावर या अगोदर पाणीटंचाई होती. मंदिराच्या बांधकामासाठी देखील पाणी कमी पडत होते.
विहिरीला पाणी आल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे असं भाविकांनी सांगितलं. या विहिरीला पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे भूगर्भ शास्त्रज्ञांनी या ठिकाणी येऊन नेमके काय झाले आहे, हे सांगावे अशी मागणीही नागरिकांनी केली. दरम्यान, आता ही विहीर पाण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. पाण्याने भरलेल्या या विहिरीचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.



