टीम AM : राज्यात जुलैमधील अतिवृष्टीनंतर ऑगस्टच्या पहिल्या तीन आठवड्यांत राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील 15 जिल्ह्यांवर अपुऱ्या पावसाचे सावट आहे. ऑगस्टअखेरपर्यंत मोठ्या पावसाचा अंदाज नसल्याने मराठवाडा आणि विदर्भात स्थिती चिंताजनक होण्याची शक्यता आहे.
ऑगस्टमधील पावसाच्या खंडाचा थेट परिणाम मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांवर दिसून येत असून, छत्रपती संभाजीनगर वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस झाला आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस झाला असून, येत्या काही दिवसांत ही संख्या सातवर जाऊ शकते. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, ऑगस्टअखेरपर्यंत राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याने पुढील दोन आठवड्यांत अनेक जिल्ह्यांमध्ये टंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते.



