टीम AM : सामाजिक न्याय विभागाने एक ऐतिहासिक आणि स्वागतार्ह निर्णय घेत लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या नावाने राज्य शासनाकडून पुरस्कार सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार भीमगीते, पोवाडे, गीतगायन व शाहीरी माध्यमातून करणाऱ्या कार्यकर्त्यांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
या पुरस्कारांतर्गत महाराष्ट्रातील 6 महसूल विभागातून प्रत्येकी 1 अशा एकूण 6 पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. प्रत्येक पुरस्कारासाठी ₹51,00/- रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल/साडी व श्रीफळ देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी किमान 2 महिला पुरस्कारार्थी निवडणे अनिवार्य करण्यात आले आहे.
पुरस्कारार्थींची निवड राज्यस्तरीय समितीमार्फत होणार असून अंतिम मान्यता मुख्यमंत्री देतील. हा निर्णय सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला बळ देणारा असून लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या विचारांना अभिवादन करणारा ठरणार आहे. समाजातील समर्पित कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा देणारा हा निर्णय सर्व स्तरातून स्वागतार्ह ठरत आहे.



